
Search Results
74 results found with an empty search
- दुःख – एक विदारक सत्य : मृत्यूवर एक नव्या दृष्टीकोनातून चिंतन -डॉ. प्रतिक मुणगेकर
"दुःख एक विदारक सत्य आहे." या वाक्याचा खरा अर्थ तेव्हाच उमजतो, जेव्हा एखादी आपली जवळची व्यक्ती अचानकपणे आपल्या आयुष्यातून कायमची निघून जाते. त्या एका क्षणात काळ स्तब्ध होतो, मन शून्य होतं, आणि एक शब्दही उच्चारायची ताकद राहत नाही. मृत्यू म्हणजे केवळ एका व्यक्तीचा अंत नव्हे, तर त्याच्याशी असलेल्या असंख्य आठवणी, अपूर्ण संभाषणं, आणि न संपलेल्या नात्यांचा शांत विस्फोट असतो. अनेकदा आपण मृत्यूला ‘शेवट’ म्हणतो, पण खरे पाहता मृत्यू म्हणजे एक संक्रमण आहे – एका अवस्थेतील दुसऱ्या अवस्थेकडे नेणारा गूढ प्रवास. मृत्यू ही एक अशा प्रकारची अनुपस्थिती आहे, जिथे त्या व्यक्तीचं अस्तित्व प्रत्येक क्षणात अधिक ठळकपणे जाणवतं. तो आपल्यात नसतो, पण त्याचं असणं सतत आपल्या विचारांमध्ये, स्वप्नांमध्ये आणि आठवणींच्या धूसर छायेत वावरत राहतं. मृत्यूचा अनुभव म्हणजे फक्त रडणं, हरवणं किंवा विरह नव्हे – तो आत्म्याला हलवणारा आणि विचारांचं मूळच बदलणारा अनुभव असतो. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांचं अस्तित्व आपल्यासाठी इतकं गृहित धरलेलं असतं की, त्यांच्या जाण्याने आपण आपलं अर्धं आयुष्यच हरवतो, असं वाटतं. पण खरंतर, त्यांची अनुपस्थितीच आपल्याला त्यांच्या खरी उपस्थितीची जाणीव करून देते. दुःख ही केवळ भावना नसते – ती एक प्रक्रिया असते. ती आपल्याला अंतर्मनातल्या खऱ्या स्वरूपाशी भेट घडवते. दुःख म्हणजे शब्दात न मांडता येणारी व्यथा – जी डोळ्यांतून अश्रूंमधून नाही, तर आत्म्यातून प्रकट होते. त्या प्रक्रियेत आपण हळूहळू समजून घेतो की, माणूस फक्त शरीराने नसतो, तर त्याच्या विचारांनी, कृतींनी आणि स्मृतींनी आपल्या आयुष्यात सतत जिवंत असतो. मृत्यू नातं तोडत नाही, ते फक्त त्याचं स्वरूप बदलतं. तो संवाद बंद करत नाही, तो शब्दांशिवाय नवा संवाद सुरू करतो. आपण त्या व्यक्तीशी मनात बोलतो, त्यांच्या आठवणींना स्पर्श करतो, आणि अनेकदा त्यांच्या शिकवणीतून नव्याने जगायला शिकतो. कधी वाटतं – आपण का रडलो? पण रडणं म्हणजे कमकुवतपणा नाही. ते तर आपल्या आत्म्याचं विलयन असतं – आपल्या अस्तित्वातील त्या व्यक्तीचा अंश आपल्यातून गळून पडत असतो. या दुःखाच्या प्रवासात एक क्षण असा येतो, जेव्हा आपण विचारतो – हे सगळं का घडलं? का असा अचानक अंत झाला? पण उत्तर कधीही बाहेर मिळत नाही. ते उत्तर आपल्याला आपल्या अंतर्मनात शोधावं लागतं. आणि ते उत्तर असतं – काही माणसं आपल्या आयुष्यात येतात फक्त आपल्याला काही शिकवण्यासाठी, आणि मग त्या निघून जातात. पण त्यांचं जाणंही एक शिकवणच असते. त्या व्यक्तीच्या नसण्यातून आपण त्यांचं खरं अस्तित्व शोधतो. त्यांच्या वारशामध्ये आपण त्यांच्या विचारांची झलक पाहतो – आणि त्यांच्या आठवणींच्या सावलीत आपण नवा ‘स्व’ शोधायला लागतो. कारण मृत्यू केवळ अंत नव्हे – तो आरंभही असतो. आपल्या आत्म्याच्या ज्या भागाकडे आपण कधी लक्ष दिलं नव्हतं, तिथे ही दुःखाची भावना आपल्याला घेऊन जाते. आणि तिथे पोहोचल्यावर आपल्याला उमगतं – मरणं हे संपणं नाही, तर एक नवा जन्म आहे – आपल्याच एका नवीन जाणिवेचा. या सगळ्या चिंतनात मृत व्यक्तीच्या फोटोंपलीकडे जाणं महत्त्वाचं असतं. कारण वारसा म्हणजे केवळ आठवणी नव्हेत – तो आहे त्यांच्या आयुष्यातल्या मूल्यांचा, कृतीचा आणि आपल्या मनावर उमटलेल्या संस्कारांचा ठसा. त्यांनी दाखवलेला प्रेमाचा मार्ग, सत्याचं भान, आणि जगण्यातली सच्चाई – हाच त्यांच्या अस्तित्वाचा खरा ठेवा असतो. आणि आपण तो पुढे चालवणं – हाच त्यांच्या जाण्याचा अर्थ असतो. शेवटी, मृत्यू ही पोकळी नाही – तो एक प्रकाशद्वार आहे. त्यातून आपण दुःखाच्या अंधारातून स्वतःकडे आणि जीवनाच्या गूढतेकडे पाहायला शिकतो. हे दुःख आपल्याला खचवत नाही, तर हलवतं. ते आपल्याला नवं काहीतरी घडवायला प्रेरित करतं – एक नव्या जाणीवेचं जीवन जगायला शिकवतं. "दुःख हे जीवनाचं शोकगीत नसतं – ते आत्म्याचं मौन संगीत असतं, ज्याला ऐकायला शिकलं, तर मृत्यूही एक नवीन जीवन वाटू लागतं."
- त्रिशुंड गणपतीपासून लाल महालापर्यंत - वर्ल्ड हेरिटेज डे निमित्त रेडिओ मिर्ची पुणेची खास हेरिटेज वॉक
पुणे, २८ एप्रिल २०२५: वर्ल्ड हेरिटेज डे (१८ एप्रिल) आणि रेडिओ मिर्ची पुणेच्या २३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने, पुणेकरांसाठी एक खास हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला — ज्याला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवार सकाळी, हा वॉक त्रिशुंड गणपती, जुना किल्ला, गुंडाचा गणपती, कसबा गणपती मार्गे लाल महाल येथे संपन्न झाला. प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ प्रसाद तारे आणि त्यांच्या टीमने हा वॉक मार्गदर्शित केला आणि पुण्याच्या समृद्ध इतिहासातील अनेक अदमास न लागलेली माहिती उलगडून दाखवली. या हेरिटेज वॉकमध्ये सुमारे ३५ पुणेकरांनी सहभाग घेतला आणि पुण्याचा ऐतिहासिक वारसा नव्याने नुभवला. भाग घेणाऱ्या काही पुणेकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या: • अमित चव्हाण म्हणाले, “मी जन्माने पुणेकर आहे पण कसबा पेठेत किल्ला आहे हे मला आजवर माहीतच नव्हतं. एकदम डोळे उघडणारा अनुभव!” • राहुल बुलबुले, एक अनुभवी प्रवासी, म्हणाले, “इथे वाढलो तरी आज अनेक नवीन गोष्टी कळल्या.” • श्रावणी, एक विद्यार्थीनी, म्हणाली, “पाठ्यपुस्तकात जे वाचलं होतं ते आज खरंखुरं अनुभवता आलं!” ही संपूर्ण संकल्पना आरजे उत्सवी आणि आरजे निधी यांनी पुढाकाराने राबवली, ज्यांना मिर्ची टीमचे दर्शन, केतन आणि रक्षित यांनी साथ दिली. कार्यक्रमाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना, स्मिता रणदिवे, क्लस्टर हेड, रेडिओ मिर्ची, म्हणाल्या, “पुण्याचा ऐतिहासिक वारसा खूप समृद्ध आहे आणि गेल्या २३ वर्षांपासून आम्ही या सुंदर शहराचा भाग आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या श्रोत्यांसाठी ही एक छोटी भेट होती — आणि मला आनंद आहे की या वॉकमुळे त्यांना फक्त आठवणी नव्हे तर आपल्या शहराबद्दल नवीन माहिती घेऊन जाता आली.” हा सुंदर सकाळचा प्रवास नाश्त्याने, हसऱ्या चेहऱ्यांनी आणि गप्पागोष्टींनी संपला — आणि पुन्हा एकदा जाणवलं, “वारसा हा फक्त वास्तूंपुरता मर्यादित नसतो, तो माणसांच्या आठवणीत जिवंत राहतो.”
- करंजाळे शाळेतील मुलांनी लिहिलेल्या "निसर्गाची शाळा" या कवितासंग्रहांचा प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न
करंजाळे: आंतरराष्ट्रीय कला दिन व करंजाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून "निसर्गाची शाळा" या बालकविता संग्रहाचा प्रकाशन मंगळवार दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी मा.श्री.विठ्ठलराव भोईर ( गटविकास अधिकारी,पं.स.जुन्नर) व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश साबळे ओतुरकर (अध्यक्ष, श्रावणधारा काव्य महोत्सव समिती) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी वि. रा. धोंडगे (शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स.जुन्नर ), पां. वि. भौरले (शिक्षण विस्तार अधिकारी, पं. स. आंबेगाव ), बा. म. भालेकर ( केंद्रप्रमुख, सितेवाडी), सा. भा. मांडवे ( केंद्रप्रमुख, मढ), श्रावणधारा समितीचे कार्याध्यक्ष प्रा. सुरेश डुंबरे, उपाध्यक्ष डॉ. खं. र. माळवे, सचिव डॉ. प्रविण डुंबरे, सहसचिव संजय गवांदे, खजिनदार व लेण्याद्री प्रकाशनाचे प्रकाशक रणजीत पवार, सहखजिनदार तथा वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई साहित्यिक दैनिकचे संपादक प्रा. नागेश हुलावळे व करंजाळे ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मुंढे, उपाध्यक्षा सैंद्रा शेळके, सदस्य नंदकिशोर जगताप, दिनेश जगताप युवराज ढेंगळे, दशरथ कोरडे, आशा शिंदे, गीताबाई शेळकंदे,मंगल मुंढे, हे सुद्धा उपस्थित होते. याप्रसंगी बालकवींना शुभेच्छा देण्यासाठी बाळासाहेब लांघी(अध्यक्ष,शिक्षक समिती, पुणे जिल्हा),पोपट राक्षे (अध्यक्ष,आर. पी. आय. जुन्नर), विकास राऊत (सामजिक कार्यकर्ते) सुभाष जगताप, कानिफनाथ लांडे, पोपट मुंढे, तुकाराम लांघी, दिनकर जगताप, उपस्थित होते. निसर्गाची शाळा काव्यसंग्रह लेण्याद्री प्रकाशनतर्फे तयार करण्यात आला आहे . शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद साजरा करत, शाळेचा ७५वा वाढदिवस मान्यवर अतिथींच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी चित्रकार प्रा. सुरेश डुंबरे यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रकाशन समारंभात धनश्री पवार, कुणाल शेळके, मयूर पारधी, ज्ञानेश्वरी शेळके या बालकवींनी आपले मनोगत व्यक्त करत आपल्या कविताही सादर केल्या व उपस्थितांची मने जिंकून घेतली. पं. स. जुन्नरचे गटविकास अधिकारी विठ्ठलराव भोईर यांनी आपल्या मनोगतात शाळेतील या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले .या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मढ केंद्राचे केंद्रप्रमुख साहेबराव मांडवे यांनी केले. निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या करंजाळे शाळेच्या मैदानात सुंदर मंडप उभारण्यासाठी नंदकिशोर जगताप यांचे सौजन्य लाभले. शाळा व्यवस्थापन समिती आणि करंजाळे गावातील ग्रामस्थांनी सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत केली होती. तर या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन उत्तम सदाकाळ यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक नामदेव मुठे व शिक्षिका सरला दिवटे यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वीरीत्या पार पाडल्या. कार्यक्रमाचे नेटके संयोजन व आभार प्रदर्शनाचे काम नंदकुमार साबळे यांनी केले.
- "मोठं होण्याची किंमत: यशस्वी लोकांचा अंतहीन संघर्ष" - डॉ प्रतिक मुणगेकर
मोठ्या माणसांना नेहमी त्रास का सहन करावा लागतो? एक कटू सत्य आणि उघड्या डोळ्यांनी पाहण्याची गरज. मोठं होणं म्हणजे केवळ यश, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवणं नाही, तर एका अखंड संघर्षाला सामोरं जाणं आहे. लहानसहान लोकं चुकतात, पडतात आणि पुन्हा उभं राहतात, पण मोठ्या व्यक्तींच्या वाट्याला मात्र प्रत्येक चूक ही त्यांच्या पतनाचा प्रारंभ मानली जाते. का? कारण समाजाला मोठ्या माणसांचं अस्तित्व मान्यच नसतं. त्यांच्यावर प्रेम करणारे कमी आणि त्यांना खाली खेचणारे जास्त असतात. समाजाला संघर्ष आवडतो, पण यश स्वीकारायला जड जातं. जेव्हा एखादी व्यक्ती संघर्ष करत असते, तेव्हा समाज तिच्यासोबत असतो, सहानुभूती दाखवतो. पण तीच व्यक्ती यशस्वी झाली की समाजाची नजर बदलते. तेच लोक ज्यांनी प्रोत्साहन दिलं होतं, आता तिच्या यशाला ‘संधीचं भांडवल’ म्हणू लागतात. लोकांना संघर्ष पाहायला आवडतो, पण कोणीतरी त्या संघर्षातून वर येऊन मोठं झालं, हे त्यांना पचनी पडत नाही. मोठ्या लोकांना गृहीत धरलं जातं. यशस्वी माणसाला कधीही ‘मानव’ म्हणून पाहिलं जात नाही. त्याच्याकडून सतत आदर्श वर्तनाची अपेक्षा केली जाते. सामान्य माणूस चिडला, रागावला, थकला तरी त्याला समजून घेतलं जातं, पण मोठ्या व्यक्तीनं जर चुकूनही तसं केलं तर त्याला कठोर न्याय दिला जातो. त्याची भावनाही नाकारली जाते, कारण समाजाला वाटतं की मोठ्या माणसांना दुखावण्याचा, थकण्याचा किंवा हार मानण्याचा अधिकार नाही! सत्य बोलणाऱ्यांना जास्त त्रास होतो. मोठे लोक खोट्या दिखाव्याऐवजी सत्य सांगतात, आणि हीच गोष्ट समाजाला त्रासदायक वाटते. कोणीतरी सत्य उघड करत असेल, चुकीला विरोध करत असेल, तर तो समाजाच्या सोयीच्या चौकटीत बसत नाही. म्हणूनच असे लोक नेहमी अडचणीत येतात. इतिहास साक्षी आहे—सत्य सांगणाऱ्यांची नेहमीच परीक्षा घेतली जाते. संकटे वाढली की शक्तीही वाढते, पण त्याची किंमत मोजावी लागते. मोठ्या व्यक्तींना सतत कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यांना विचारायचं झालं तरी कुणाला विचारायचं? बोलायचं झालं तरी कुणाशी बोलायचं? कारण ज्या क्षणी ते आपली व्यथा उघड करतात, त्याक्षणी समाज त्यांच्यात कमजोरी शोधतो. त्यामुळे मोठी माणसं आतून खचतात, पण बाहेरून कठीण बनतात. समाजाला त्यांचा आत्मविश्वास दिसतो, पण त्यामागचा एकाकीपणा कोणीच पाहत नाही. विश्वासघात ही अपरिहार्य गोष्ट असते. मोठ्या लोकांनी नेहमीच हा कटू अनुभव घेतलेला असतो—जेव्हा यश लहानसं असतं, तेव्हा आपलेच लोक आपल्यासोबत असतात, पण जसा आपण मोठे होतो, तसतसे हेच लोक आपल्या विरोधात जातात. स्वार्थासाठी नाती बदलतात, मैत्री बदलते, आणि एक दिवस मोठी व्यक्ती स्वतःच्या सावलीशिवाय एकटी उरते. मोठ्या लोकांचं दु:ख कोणी समजून घेत नाही. लोकांना वाटतं की मोठ्या व्यक्तींना कोणत्याही गोष्टीची चिंता नसते—त्यांच्याकडे पैसा आहे, नाव आहे, यश आहे. पण कोणीतरी मोठं होण्यामागे त्याच्या झगड्यांचं प्रमाण अधिक असतं. झोपेचे तास कमी असतात, मनःशांती हरवलेली असते, आणि सतत काहीतरी गमावण्याची भीती असते. लोकांना त्यांचा वैभवशाली चेहरा दिसतो, पण त्या चेहऱ्यामागे असलेल्या मानसिक तणावाची जाणीव होत नाही. मोठ्या माणसांनी काय करावं? 1. समाजाला बदलता येणार नाही, पण स्वतःला मजबूत करता येईल – लोक काय म्हणतील, याचा विचार करणं बंद करा. 2. स्वतःच्या माणसांना ओळखा – प्रत्येकजण तुमचा मित्र नसतो. जे खऱ्या संकटाच्या काळात सोबत राहतात, तेच खरे आपले. 3. स्वतःच्या कष्टावर श्रद्धा ठेवा – यशावर इतर लोक हक्क सांगतील, पण संघर्ष तुमचाच असतो. 4. स्वतःला वेळ द्या – पैसा, प्रसिद्धी, सत्ता यांच्यापेक्षा मानसिक शांती अधिक मौल्यवान आहे. मोठी स्वप्नं पाहणाऱ्या आणि ती पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना कायम संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष कधीही संपत नाही. जितके उंच जाल, तितकी वारे जास्त झोके देतील. पण ज्यांना या झोक्यांची भीती वाटत नाही, तेच शेवटी इतिहास घडवतात. म्हणून मोठी स्वप्नं बघा, संघर्षाला सामोरे जा, आणि कोणाच्याही टीकेला न जुमानता स्वतःच्या मार्गावर चालत राहा. "कारण समाजाने कितीही विरोध केला तरी, सूर्य कधी प्रकाश देणं थांबवत नाही!"
- हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा
कासार आंबोली – हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल येथे २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा करण्यात आला. मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा दिवस दरवर्षी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य, भाषणे, बडबडगीते, कविता, नाटक, लावणी, भारूड, लोकनृत्य आणि पारंपरिक वेशभूषा सादरीकरण यांसारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. तसेच, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. रेणू पाटील यांनी मार्गदर्शन केले, तर सूत्रसंचालन सौ. प्राजक्ता आमराळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन शाळेतील Yellow हाऊस तर्फे करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. कृष्णा भिलारे, सचिव सौ. संगीता भिलारे, संचालक श्री. कुणाल भिलारे, व्यवस्थापिका सौ. यशस्विनी भिलारे आणि प्राचार्या डॉ. सौ. रेणू पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या भव्य आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण झाली असून, मराठी संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित झाले.
- कीर्तन: रुपेरी पडद्यावर इतिहास घडवणारा भव्य चित्रपट! दिग्दर्शक अतुल जगदाळे लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत!
मुंबई, (प्रतिनिधी) : ग्लॅमरस आणि मनोरंजनप्रधान विषयांपासून वेगळ्या वाटेवरचा एक अनोखा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे! मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक अतुल जगदाळे यांच्या ‘कीर्तन’ या आगामी चित्रपटाविषयी सध्या चित्रपटसृष्टीत विशेष चर्चा सुरु असल्याचे ऐकिवात येत आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेवर आधारित हा भव्यदिव्य चित्रपट प्रेक्षकांना वेगळ्या विश्वात घेऊन जाईल असे जाणकार सांगत आहेत. या चित्रपटाची निर्मिती ‘अतुल जगदाळे प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या बॅनरखाली होत असून, तो आतापासूनच उत्कंठतेचा विषय ठरला आहे. अध्यात्म – एक नवा प्रयोग! ‘कीर्तन’ हा चित्रपट केवळ संतपरंपरेवर आधारित धार्मिक चित्रपट नसून, त्याला एक भव्य दृष्टीकोन देण्यात आला आहे. कीर्तनकारांच्या जीवनावर प्रकाश टाकत, त्यामधील संघर्ष आणि समाजप्रबोधनाचे महत्त्व उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून होणार आहे. भव्य सेट्स, अप्रतिम छायांकन आणि दमदार कथा यामुळे हा चित्रपट केवळ इतिहास नव्हे, तर समकालीन रसिकांसाठीही एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव असणार आहे. कलावंत कोण असतील? संगीत कोणाचे? – उत्सुकता वाढली! 'कीर्तन' म्हटलं कि ओघाने संगीत-लोकसंगीत आलंच. त्यामळे चित्रपटसृष्टीत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे ‘कीर्तन’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा कोणाच्या हाती असणार? या विषयाला अत्यंत प्रभावी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या सुरांची नस जाणणाऱ्या प्रतिभावंत संगीतकारांपैकी नेमकी कोणाकडे ही धुरा सुपूर्द होणार? कीर्तनात कोणत्या गायकांचा स्वर तल्लीन करणार? या चर्चांना उधाण आले आहे. तसेच या भव्य चित्रपटात कोणकोणत्या दिग्गज कलावंतांची वर्णी लागणार आहे याविषयीसुद्धा कमालीचे औत्सुक्य आहे. निर्माते-दिग्दर्शक अतुल जगदाळे यांनी यासंदर्भात गुप्तता राखली असली, तरी ‘लवकरच मोठी घोषणा होईल’ असे त्यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे चित्रपटप्रेमींच्या उत्कंठेला आणखी उधाण आले आहे. ‘गणवेश’च्या यशानंतर नवा प्रयोग! ‘गणवेश’ या सामाजिक आशयाच्या चित्रपटानंतर तीन- चार वर्षांपासून अतुल जगदाळे यांनी एका भव्य दिव्य हिंदी चित्रपटावर काम सुरु केले आहे. त्यासोबत त्यांनी आपल्या मातृभाषेतील कलाकृतीलाही विशेष प्राधान्य देत मराठी माणसाला प्रिय असलेले 'कीर्तन' भव्य रुपेरी पडद्यावर सादर करण्याचा प्रयोग करत आहेत. अतुल जगदाळे यांना कलावंत तंत्रज्ञ निवडीची अचूक जाण आहे. त्यांच्या ‘गणवेश’ मध्ये दिलीप प्रभावळकर, मुक्ता बर्वे, किशोर कदम, स्मिता तांबे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे ‘कीर्तन’ मध्ये कोणती स्टारकास्ट असणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- हेरिटेजच्या मुलांनी घेतला ऐतिहासिक ‘छावा’ चित्रपटाचा अस्वाद, व मिळाला उस्फुर्त प्रतिसाद.
हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल, कासार अंबोली, मुलशी, पुणे दिनांक - २५ फेब्रुवारी २०२५ हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक श्री. कृष्णा भिलारे सर, सचिव सौ. संगीता भिलारे मॅम व्यवस्थापक संचालक अध्यक्ष श्री.कुणाल भिलारे सर तसेच व्यवस्थाकीय संचालिका सौ. यशस्विनी भिलारे मॅम व शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. डॉ. रेणू पाटील मॅम यांनी फेब्रुवारी २०२५ ला विद्यार्थ्यांना दिनांक २४ आणि २५ तारखेला ऐतिहासिक चित्रपट "छावा" पाहण्याची एक चांगली संधी प्रदान केली. या चित्रपटाने स्वराज्यप्रती असणारे प्रेम हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्ष आणि बलिदानांबद्दल आदर आणि कौतुकाची भावना जागृत केली आहे. "छावा" हा २०२५ चा ऐतिहासिक कृती चित्रपट आहे. जो छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे, जो शिवाजी सावंत यांच्या प्रसिद्ध कादंबरीने प्रेरित आहे. या चित्रपटात त्यांचे शौर्य, दृष्टी आणि स्वराज्य प्रेम आणि आपल्या हिंदवी राज्याविषयी असणारे अतूट समर्पण यांचे एक शक्तिशाली चित्रण रेखाटले असून जिवंत देखावा हा मनाला अगदी भावनिक व हृदयाला स्पर्शून जातो. " छावा" पाहणे हा एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक हेतू आहे. हे मराठा योद्धा आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या संघर्षाची जाणीव विचारात घेतलेल्या कथा आणि त्याग प्रकाशित करते, विशेषत: समाजावरील युद्धाच्या,निर्बलतेच्या, जाती विचार ह्या सारख्या परिणामावर आणि मागे राहिलेल्या लोंकाच्या लवचिकतेच्या मनावर विचार करून लक्ष केंद्रित करते. छत्रपती संभाजी महाराजांचे धैर्य व संघर्ष दर्शविणारे मराठा धर्म रक्षक आजच्या युगात हा चित्रपट मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करतो. तसेच हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी स्वराजासाठी केलेले बलिदान आणि या मावळ्यांचे ऐतिहासिक महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करते. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा धगधगता इतिहास मांडणाऱ्या बहुचर्चित ‘छावा’ या हिंदी चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून हेरिटेजच्या विद्यार्थ्यांनी देखील त्याचा उस्फूर्त प्रतिसाद घेतला तसेच चित्रपट दरम्यान विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात जयघोष करत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना देखील करून डोळ्यातील अश्रू वाहत छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी प्रेम व आपुलकी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना ज्ञानात भर घालून ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकल्याबद्दल आणि हिंदवी मराठा साम्राज्याच्या समृद्ध वारशाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल या चित्रपटाचे मनापासून कौतुक व शतशः आभार.
- समर्थ च्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत यश
अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन बंगलोर व सॅमसंग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बँगलोर येथे झालेल्या "अन्वेषण" या राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेत समर्थच्या विद्यार्थ्यांना "१०० टाईम्स क्युरियस क्वेश्चन अवार्ड " हे विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आल्याची माहिती समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे व गुरुकुल चे प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी दिली. ही स्पर्धा सॅमसंग सेमिकन्डक्टर इंडिया यांनी पुरस्कृत केली होती.अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या सहयोगाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी नुकतीच विज्ञान आणि तंत्रज्ञान राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा बँगलोर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालय,बेल्हे कम्प्युटर इंजिनिअरिंग अंतिम वर्षात शिकत असलेले ऋतुजा गवांदे व वैष्णवी गणेश आणि समर्थ गुरुकुल मधील प्रगती औटी व प्रांजल दाते या ग्रुप ने सादर केलेल्या "कृषी तज्ञ" या प्रकल्पान्वये विद्यार्थ्यांना विचारल्या गेलेल्या शंभर प्रश्नांना अतिशय समर्पक उत्तरे देत समर्थ च्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. रुपये पाच हजार रोख,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. हा प्रकल्प तयार करण्यासाठी समर्थ अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी,कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.स्नेहा शेगर,प्रा.प्रियांका लोखंडे,प्रा.अजिंक्य,अभंग प्रा.राणी बोऱ्हाडे तर समर्थ गुरुकुलच्या प्रिया कडूसकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
- जन्मोत्सव शिवरायांचा सोहळा मराठी अस्मितेचा : हेरिटेज इंटरनॅशनल स्कुल ,कासार आंबोली
जन्मोत्सव शिवरायांचा सोहळा मराठी अस्मितेचा “प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...” असा जयघोष करत हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल कासार आंबोली येथे आज मोठ्या जल्लोषात शिवजन्मोत्सव म्हणजे शिवजयंती साजरी करण्यात आली. या वर्षाची कार्यक्रमाची मुख्य संकल्पना शिवराज्याभिषेक सोहळा ही होती. “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते.” राजमुद्रेवर कोरलेल्या या शब्दांनी महाराजांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच शाळेत महाराजांचे स्मरण करण्यासाठी त्यांच्या कार्याची थोरवी जाणण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती उत्सवात खालील सादरीकरणांचा समावेश होता: कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमात सादर होणारे विविध सादरीकरण रुपी पुष्पांनी जणू एक माळच गुंफण्यात आली. या माळ मार्फत महाराजांचा जीवनकाल नाट्यरुपात अमृता शिंदे इ. 9वी व वृद्धी राजगुरू इ. 6वी. या विद्यार्थिनींनी सादरीकरण केले. शिवरायांचा पाळणा या नृत्यातून शिवरायांचा जन्मोत्सव दाखवण्यात आला. लाठीकाठी या नृत्यामार्फत शिवरायांचे युद्ध कौशल्यांचे प्रदर्शन करण्यात आले त्यानंतर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा नृत्य व नाटकामार्फत दाखविण्यात आला. राज्याभिषेकासाठी मासाहेब जिजाऊ व राजा छत्रपती यांचे अश्वारूढ होऊन आगमन झाले. व राज्याभिषेक सोहळा दाखविण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक शपथ विधी दाखवण्यात आला. त्यानंतर इयत्ता सहावीच्या हिमाक्षी बीटे हिने आपल्या भाषणामार्फत महाराजांची थोरवी गायली. 3री ते 5वी व इयत्ता 6वी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले त्यातून शिवाजी महाराजांचे शौर्य साहस व पराक्रम दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच इयत्ता 7वी चे विद्यार्थी नील देवजीरकर आणि अमेय भोसले या विद्यार्थ्यांनी महाराजांवरती एक सुंदर असं रॅप गायले. इयत्ता पहिली व दुसरी अनुक्रमे स्पृहा हिमगिरे शरण्या व राजवीर पाटील यांनी महाराजांची माहिती सांगणारे कथाकथन केले. तसेच शाळेच्या व्यवस्थापकीय संचालक सौ. यशस्विनी भिलारे यांनी महाराजांविषयी विचार प्रकट केले. आपल्या भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना महाराजांविषयी माहिती मिळवण्यासाठी जास्तीत जास्त वाचन करण्यासाठी आव्हान केले. विद्यार्थ्यांना महाराजांच्या चरित्राविषयी, महाराजांच्या कार्याविषयी आणि गड किल्ले यांची माहिती व्हावी म्हणून प्रश्नमंजुष्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक शिवगर्जनेने आसमंत दुमदुमला. कार्यक्रमाचे शेवटी श्री कुणाल भिलारे यांनी मुलांचे कौतुक केले. शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या डॉक्टर रेणू पाटील यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुषमा पाटील यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शाळेतील Yellow हाऊस ने केले होते. कार्यक्रम सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभागने अतिशय सुंदर रित्या पार पडला. शिवजयंती निमित्त शाळेत एक आठवडा आधीच विद्यार्थ्यांना विविध ऍक्टिव्हिटीज देण्यात आल्या होत्या जसे की निबंध लेखन, पोस्टर तयार करणे, शिवगर्जना पाठांतर, शिवमुद्रा लेखन व पाठांतर, शिवरायांची वंशावळ लेखन, शिवरायांचे कथांचे वाचन व वर्गात सादरीकरण अशा अनेक ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी आठवडाभरात पूर्ण केल्या. शिवजयंतीसाठी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच व विद्यमान सदस्य कासार आंबोली श्री उमेश सुतार उपस्थित होते. तसेच शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री कृष्णा भिलारे, संस्थापक सचिव सौ संगीता भिलारे, व्यवस्थापकीय संचालक श्री कुणाल भिलारे, समाजसेवक गणेशभाऊ भिलारे ,शाळेच्या प्राचार्या डॉ. रेणू पाटील उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय !
- झी स्टुडिओज' सादर करीत आहेत, आता थांबायचं नाय!'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शन यांची एकत्र निर्मिती!
बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच बीएमसीच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं नाय' या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे, शिवराज वायचळने. सोबतच लोकप्रिय अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे आणि आशुतोष गोवारीकरअशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे. पहिल्यांदाच हे सर्व दिग्गज कलाकार एकत्र आल्याने या चित्रपटाची कथा काय असणार याचं औत्सुक्य प्रेक्षकांमध्ये नक्कीच असणार आहे. हृदयाला भिडणाऱ्या अद्वितीय प्रेरणादायी कथेच्या दर्जेदार सादरीकरणासाठी तसेच निर्मितीसाठी चित्रपट निर्मिती क्षेत्रातील लोकप्रिय आणि विश्वसनीय 'झी स्टुडिओज' ही संस्था पुढे आली असून त्यांच्यासोबत हिंदी चित्रपट क्षेत्रातील नावाजलेले निर्माते निधी परमार-हिरानंदानी, धरम वालीया ही धुरा उत्तम निभावत आहेत, या निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच “श्रीकांत” फेम तुषार हिरानंदानी हे या सिनेमासाठी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम पाहत आहेत, आज सोमवार १६ डिसेंबर २०२४ रोजी 'आता थांबायचं नाय' या सिनेमाचा मुंबई महानगर पालिका आयुक्त माननीय भूषण गगराणी, किरण दिघावकर महापालिका उपायुक्त, झी स्टुडिओजचे चिफ बिझनेस ऑफिसर उमेश के बन्सल, झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवेलकर, निर्माते निधी परमार - हिरानंदानी, धरम वालीया, क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी, निवृत्त सनदी मनपा अधिकारी उदयकुमार शिरुरकर या खास मान्यवरांसह चित्रपटातील मुख्य कलाकार तंत्रज्ञाच्या उपस्थितीत ग्रांट रोड येथील गिल्डर टँक महापालिकेच्या शाळेत मुहुर्त संपन्न झाल्यानंतर लगेचच चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. मराठी चित्रपटविश्वात एका कर्तबगार आणि संवेदनशील अधिकाऱ्यासंबंधीची ही सत्यकथा नक्कीच वेगळी ठरेल. “मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात तेजाचा किरण आणणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाचा प्रवास मांडण्याची संधी मिळणं, ही गोष्ट 'झी स्टुडिओज'साठी अत्यंत भाग्याची आहे. मराठीत येणारा एक वेगळा आणि प्रेरणादायी सिनेमा पाहणं, ही एक पर्वणीच ठरणार आहे.” - उमेश के बन्सल, चिफ बिझनेस ऑफिसर, झी स्टुडिओज “मुंबई महानगरपालिकेमधल्या कर्तबगार कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित आहे. मात्र ही घटना अत्यंत प्रेरणादायी असून, मराठीत पहिल्यांदाच अशाप्रकारची मांडणी केली जाणार आहे. मुंबई महापालिकेने या चित्रपटासाठी जे सहकार्य दिलं आहे, त्यासाठी एक मुंबईकर आणि सिनेव्यवसायिक म्हणून आम्ही नक्कीच आभारी आहोत.” - बवेश जानवेलकर, बिझनेस हेड, झी स्टुडिओ "साधारण शासन असेल किंवा महापालिका असेल नेहमी काय केलं जात नाही या टीकेला आम्हाला दैंनदिन सामोरं जावं लागतं. महापालिकेत म्हणा, शासनात म्हणा अनेक चांगले उपक्रम चालू असतात, चांगले अधिकारी असतात ते चांगली कामे करीत असतात. त्याच्या नोंदी बऱ्याच वेळा घेतल्या जात नाहीत किंवा घेतल्या तर त्यात काही त्रुटी राहतात. म्हणूनच या चित्रपटाच्या माध्यमातून चांगला उपक्रम आपल्यासमोर येतोय. अश्या प्रकारे या कामांची नोंद कायमस्वरूपी घेतली जाईल आणि लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. म्हणूनच मला महापालिकेच्या वतीने आनंद व्यक्त करावासा वाटतोय. मी सर्वांचे अभिनंदन करतो." भूषम गगराणी - बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त “मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी खरंच काय करू शकतात, याची चुणूक दाखवणारी आमच्या गुणी अधिकाऱ्यांच्या कामाची दखल घेणारी कलाकृती तयार होतेय, याचा आनंद आहे.” - किरण दिघावकर - उपायुक्त, मुंबई महापालिका “प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहताना कायमच नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचबरोबर आमच्या कर्मचाऱ्यांचीही प्रगती व्हावी, असा विचार मनात आला आणि त्यावर अंमलबजावणीही केली. हा प्रवास आता चित्रपटातून मांडला जाणार आहे. अधिकारी म्हणून काम करताना जे आनंदाचे आणि समाधानाचे क्षण असतात त्यातला एक क्षण आता या सिनेमाद्वारे कायमचा आठवणीत राहणार आहे.” - उदयकुमार शिरुरकर, निवृत्त सनदी अधिकारी “मुंबई महानगरपालिका क्षेत्रात फुललेली अत्यंत प्रेरणादायी कथा, त्यासाठी झी स्टुडिओ, सहकारी आणि मुंबई महानगर पालिका यांचे योगदान असल्यानेच 'आता थांबायचं नाय', शक्य झाले आहे.” - क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी चित्रपट - 'आता थांबायचं नाय' दिग्दर्शक - शिवराज वायचळ निर्माते : झी स्टुडिओज - उमेश के बन्सल आणि बवेश जानवेलकर चॉक अँड चीज प्रॉडक्शन - निधी परमार – हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर - तुषार हिरानंदानी फिल्म जॅझ - धरम वालीया लेखक - शिवराज वायचळ, ओमकार गोखले आणि अरविंद जगताप कलाकार - भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे आणि आशुतोष गोवारीकर
- सामूहिक गायनानंतर ‘वंदे मातरम्’चा जयघोष‘एक पाऊल देशासाठी-वॉकेथॉन’मध्ये दोन हजार पुणेकरांचा सहभाग
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा युद्धघोष असणाऱ्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम्’ या तेजस्वी काव्याच्या निर्मितीचे 150व्या वर्षात पदार्पण झाल्याचे निमित्त साधून आज (दि. 11) सुमारे दोन हजार पुणेकरांनी वॉकेथॉनमध्ये सहभागी होत संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे सामूहिकरित्या गायन करून ‘वंदे मातरम्’चा जयघोष केला. शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या सहकार्याने आज सकाळी 7 वाजता ‘एक पाऊल देशासाठी-वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. अनुराधा येडके आणि सचिव राज तांबोळी व संस्थेच्या संपूर्ण टीमने याचे संयोजन केले. वॉकेथॉनच्या आयोजनाबाबत डॉ. येडके यांनी प्रास्ताविकात निरोगी व सदृढ देशाच्या उन्नतीसाठी व्यायामाचे महत्त्व सांगितले व वंदे मातरम्च्या गीतातून प्रेरणा घेऊन शारीरिकदृष्ट्या देश सक्षम करण्याचे आवाहन केले. म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे सुमारे दोन हजार पुणेकर एकत्र आले. यात शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता. येथे ‘वंदे मारतम्’चे सामूहिकरित्या गायन झाले. ‘वंदे मातरम्’चे संशोधक-अभ्यासक मिलिंद सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती. इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक आनंद हर्डिकर, संगीतकार अजय पराड, युवा गायक देवव्रत भातखंडे, वंदेमातरम् सार्ध शती समारोह समितीचे कार्यवाह संजय भंडारे उपस्थित होते. ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनापूर्वी विजय केळकर यांनी शंखनाद केला. ‘वंदे मातरम्’ या साहित्यकृतीच्या निर्मितीचा थोडक्यात आढावा सादर करून प्रमुख अतिथी मिलिंद सबनीस म्हणाले, ‘वंदे मातरम्’विषयी हृदयात असलेले अतोनात प्रेम नागरिक विविध उपक्रमांद्वारे व्यक्त करीत आहे. येत्या वर्षभरात ‘वंदे मातरम्’चा देशपातळीवर जागर होणार आहे.. ‘वंदे मारतम्’च्या निर्मितीचे 150वे वर्ष सुरू झाल्याच्या निमित्ताने भारतीय इतिहास संकलक समितीच्या माध्यमातून वंदे मातरम् सार्ध शती जयंती समारोह समितीतर्फे राष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या सहकार्याने वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. शुभारंभ लॉन्स ते राजाराम पूल आणि परत शुभारंभ लॉन्स असा वॉकेथॉनचा मार्ग होता. ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जोशपूर्ण घोषणा देत नागरिकांनी मार्गक्रमण केले. लिना पुरोहित यांनी सूत्रसंचालन केले तर राज तांबोळी यांनी आभार मानले.
- माझ्या मातीतला चित्रपट मातृभाषेतच करायचा होता, 'घात'ने ही संधी दिली!- लेखक - दिग्दर्शक छत्रपाल निनावे
भारतीय चित्रपटांचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांनी आपल्या मातीत पहिला चित्रपट तयार करून येथे चित्रपट निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली, डॉ. व्ही शांताराम यांनी त्यावर कळस चढवला आणि त्यानंतर एकापेक्षा एक धुरंधरांनी चित्रपटसृष्टीचा पाया मजबूत करण्याचे अफाट कार्य सुरु ठेवले आहे. याच शृंखलेत नवं काहीतरी करण्याच्या उमेदीने दिग्दर्शक छत्रपाल निनावे नव्या पिढीचे नेतृत्व करीत आहेत. अगदी गडचिरोलीच्या खोल जंगलात अख्या चित्रपटाचं युनिट घेऊन जात त्यांनी शिलादित्य बोरा यांची ''प्लॅटून वन', मनीष मुंद्रा यांची 'दृश्यम फिल्म्स' आणि मिलापसिंह जडेजा, संयुक्ता गुप्ता आणि कुणाल कुमार यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केलेल्या 'घात' हा चित्रपट नुसता दिग्दर्शितच केला नाही तर अनंत अडचणींवर मात करीत थेट जगात अतिशय प्रतिष्टीत असलेल्या बर्लिनल आंतरराष्ट्रीय महोत्सवात स्थान मिळविणारा जगातील एकमेव चित्रपट होण्याचा रेकॉर्ड तयार केला आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून आता 'घात' महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला २७ सप्टेंबरला येत आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी केलेला हा संवाद घातचं कथानक कसं सुचलं ? मी पहिले मुंबईला होतो. एक फिल्म केली पण ती वर्कआऊट झाली नाही. त्यानंतर मी इंडस्ट्रीत सिनेमेटोग्राफर, एडिटर, पोस्ट प्रोडक्शन अशा पद्धतीची कामं केली. मग म्हटलं एक स्वत: एक फिल्म करूया पण ते होऊ शकलं नाही. तेव्हा ठरवलं की फिल्ममेकिंगला टाटा बाय बाय करणार, शेवटची शॉर्ट फिल्म करणार. ती करण्यासाठी नागपूरला गेलो.… आम्ही चार पाच मित्र मिळून तेथील जंगलात जाऊन आम्ही एक शॉर्टफिल्म शूट केली. त्या शॉर्ट फिल्मने मला होप्स दिले ती शॉर्टफिल्म 'घात' याच नावाने केली होती. ती माझ्या ‘घात’ सिनेमातील पहिला चॅप्टर, फाल्गुनची कथा आहे. ती आम्ही शूट केली तेव्हा एंडच्या वेळी दोन कॅरेक्टर्स सडनली येत होते. ते जितेंद्र आणि मिलिंदचे कॅरेक्टर्स आहेत. या व्यक्तिरेखांना स्वतःची गोष्ट हवी आहे हे शॉर्टफिल्म केल्यावर जाणवलं. म्हणून याचा एक पिच व्हिडीओ तयार केला. पुन्हा निर्माते शोधण्यासाठी चक्रा मारल्या. आधी बरेच निर्माते तयार होत नव्हते पण 'दृश्यम फिल्म्स'ला शेवटी तो व्हिडीओ आवडला.- पसंत पडला. त्या दुर्गम भागातल्या शूटिंगचे किस्से सांगा ना… ! आम्ही वर्कशॉपला गेलो होतो. ते गाव खरोखरच नक्षल भागात होत. तिथे पोलिसही जात नाहीत. आम्ही धाडस करून तिथे पोहचलो. सुरुची, माझी असिस्टंट किमया, कॉश्च्युम डिझायनर उत्पला, मी आणि माझा सहाय्यक दिग्दर्शक प्रशांत असे आम्ही जंगलातून चालत तिकडे गेलो. जाताना आम्हाला जळलेल्या गाड्या दिसल्या, रेड बॅनर्स दिसले. तिथल्या पोलीस चौक्या दिसल्या त्या खूप वेगळ्या किल्यासारख्या आहेत. त्यांच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. पुढचा रस्ता खूप खराब होता, जीपही जाऊ शकत नव्हत्या. ड्राइव्हर म्हणाले आम्ही इथेच थांबतो, त्यामुळे आम्ही पायी निघालो. तिथली झाडी खूप दाट असल्याने भयानक रस्ता होता, सहा फूटाच्यावर सुद्धा काही दिसत नाही. वाघ - नक्षली कोणीही आले तरी दिसणार नाही अश्या रस्त्यातून आम्ही त्या गावात पोहचलो. गावात पोहचल्यावर एकदम युनिक अनुभव आला, गाव जिथं इलेक्ट्रिसिटी नाही. अश्या आदिवासी गावात आम्ही पोहचलो, त्यांचं आदरतिथ्य कमालीचं होतं. मोठ्या मनाची माणसे आहेत सगळी. आम्ही परत जायला निघालो तेव्हा समजलं कि आमचे दोन्ही जिपचे ड्रॉयव्हर्स जंगलातल्या भीतीने गावात पोहचले होते. हा अनुभव खूप थरारक होता, तिथून आम्ही टिपागडावर गेलो तो भाग पहाडी होता. पहाडावर एक सुंदर तलाव परिसर आहे. तिथे गोंड राजाचा किल्ला आहे. तिथून भोवतालच्या परिसरावर नजर ठेवली जाते. आमच्यासोबत असलेला कुत्रा येताना अचानकपणे विचित्र वागू लागला. मला जंगली प्राण्याबद्दल माहिती असल्याने मी सगळ्यांना एकत्र राहण्याच्या सूचना केल्या.. आम्ही खाली उतरत असताना आमचा पाठलाग लेपर्ड करत असल्याचे दिसले. असे अनेक थरारक अनुभव आम्ही घेतले होते. आमचा साऊंड डिझायनर जंगलात साउंड रेकॉर्ड करीत असताना त्याला वास आला म्हणून तो गाडीत बसला, आणि त्याच्यासमोर वाघ होता. तसेच जितेंद्रला स्पॉट बॉयने अर्धे खाल्लेले हरीण दाखविले होते असे अनेक प्रसंग आम्ही पहिले आहेत. ‘घात’ची भाषा टिपिकल मराठी वाटत नाही यामागे विशेष काही कारण आहे का ? हो! हा सिनेमा महाराष्ट्राच्या सीमा भागातला असल्याने, मराठीची ही पोटभाषा झाडीबोलीतला आहे.. तिचा लहेजा वेगळा आहे, हा भाग महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बॉर्डरचा असल्याने या बोलीत हिंदी मिश्रित संवाद बोलले जातात. ही गोष्ट झाडीपट्टीतल्या माणसांची आहे, त्यांच्या जगण्याची आहे. त्यामुळे ही गोष्ट त्यांच्या बोलीभाषेतून मांडली आहे. बोलीभाषेसोबतच नक्षलवाद हा दुर्दैवाने तिथलं वास्तव आहे. त्यामुळे गोष्टीत ते टाळताच येणार नव्हतं. मग ते गोष्टीत आले आणि त्यांच्यासोबत सगळा संघर्षही. तुम्ही स्वत: कधी नक्षलवाद्यांना भेटलात का? नाही. प्रत्यक्ष भेटलो नाही, मी लहान असताना एकदा इटिहा डोहाच्या परिसरात गेलेलो. तिथे नक्षलवादी आले होते. त्यांनी काही त्रास दिला नाही पण ते आल्यानंतर तिथलं वातावरण एकदम तणावपूर्ण झालं होतं. त्यामुळे नक्षलवादी, गावं, त्यातला ताण हे सगळं मी अनुभवलं आहे. माझा असिस्टंट प्रशांत, फाल्गुनच्या भूमिकेतला धनंजय मांडवकर यांनी पाहिले आहेत. शिवाय गावकऱ्यांशी बोलताना अनेकदा कळत नकळत त्याचे संदर्भ आलेच होते. त्यामुळेच कुठेतरी हा सिनेमा अधिक खरा झाला. त्यामुळेच एका इंग्रजी वृत्तपत्रात सिनेमाबद्दल जेव्हा लिहीलं गेलं तेव्हा, यातले नक्षलवादी फिल्मी वाटत नसून खरेखुरे वाटतात, असा विशेष उल्लेख झाला. सिनेमातली पात्र कशी सापडली? विशेषत: पेरकुसारखी सुरुचीने अतिशय सुंदर ऑडिशन दिली त्यामुळे तिची निवड करणं भागच होतं मला. तिचा गोरा रंग, शहरी दिसणं या सगळ्याला विसरुन जावं, अशी कामगिरी सुरुचीने केली आहे. पेरकुची निवड म्हणजे एक धमालच होती. खूप ऑडिशन झाल्या पण पेरकु सापडेना. शेवटी गंमत अशी झाली की जनार्दन कदम आले ऑडिशनसाठी. त्यांनी ती ऑडिशन चांगली दिली. आम्ही निवड करणारच होतो. पण त्याआधी कदम म्हणाले, ते अनुसूचित जातीतील असल्याने त्यांना फिल्मच मिळत नाही. मी त्यांना म्हणालो, पाहा मला तुमची जात नको तुमचा अभिनय हवाय. तो उत्तम दिलात की, रोल तुमचाच. कदमांनी सुंदर ऑडिशन दिली आणि पेरकु पटकावला. या विषयावर विचार करताना लक्षात आलं की, अरे अशा मातीतल्या माणसांच्या भूमिका लिहील्याच गेलेल्या नाहीत. ज्या दिसतात. त्या शहरी, मध्यमवर्गीय नाहीतर एका साच्यातले गावकरी. मग या मातीतल्या माणसांची गोष्ट, जंगलाची गोष्ट जगापुढे आणायची तर आपल्याला सिनेमा करावाच लागणार बॉस. वर्क इन प्रोग्रेस लॅबचा किती फायदा झाला खूप फायदा झाला. कारण आम्ही आमच्या दृष्टीकोनातून सिनेमा पाहत होतो, तयार करत होतो. वर्क इन प्रोग्रेस लॅबमध्ये इतर अनेक तज्ज्ञांचे दृष्टीकोन मिळाले. फिल्म पुढे नेण्यासाठी काय करायचं, याचा खूप उपयोग झाला. ऑलिव्हिया स्टीवार्ट, फिलिपा कॅम्पेल .??...... यांच्यासारखे तज्ज्ञ लोकं होते. त्यांच्यामुळे एक नवी दृष्टी मिळाली. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलने तुम्हाला दोन वेळा बोलावणं पाठवलं होतं ना?त्याविषयी सांगा ना? बर्लिनला आम्हाला फिल्म पाठवायची होतीच. मात्र ते त्यावेळी झालं नव्हतं. मीनाक्षी शेडे ज्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलच्या साऊथ एशिया कन्सल्टंट आहेत. त्यांचा मला एक दिवस फोन आला. त्या म्हणाल्या, छत्रपाल तुझी फिल्म बर्लिन फिल्म फेस्टिव्हलच्या वेबसीरिज विभागाच्या प्रमुख ज्युलिया फिडेल यांनी पाहिली. त्यांना ती अतिशय आवडली. फिल्ममध्ये तीन चॅप्टर आहेत तर ती वेबसीरिज म्हणून देशील का असं त्या विचारतायत. मी विचारात पडलो. म्हटलं मला बर्लिनला जायचं आहे, पण ही फिल्मच राहणार कारण पहिल्यापासून मी तिचा विचार फिल्म म्हणूनच केलाय. मीनाक्षी मला म्हणाल्या, बघ अरे विचार कर. पण मी ठाम होतो. मग मीनाक्षींनी ज्युलियांना फोन करून सांगितलं. ज्युलिया यांनी तेव्हाचे फिल्म निवड समितीचे प्रमुख कार्लो चॅट्रीयन यांना सांगितलं. मग पुढे मायकेल स्तत्झ (Micheal stutz) हे तेव्हा पॅनोरमाचे हेड होते. त्यांनी फिल्म पाहिली आणि निमंत्रण पाठवलं. ते साल होतं २०२१. तेव्हा आम्हाला काही कारणाने जमलं नाही पण २०२३ मध्ये पुन्हा संधी मिळाली आणि आम्ही बर्लिनला पोहोचलो. अशाप्रकारे एकाच सिनेमाला दोनदा निमंत्रण मिळण्याचा प्रसंग पहिल्यांदाच बर्लिन फिल्म फेस्टिव्हलला घडला होता. जर बर्लिन फिल्म फेस्टिवल नसता तर ही फिल्म बाहेर आली नसती, अटकली असती, जगभरात पोहचली नसती. मी त्यांचा कायम ऋणी राहील














