top of page

डॉ. जयंत नारळीकर : बालमनाला अंतराळाची स्वप्नं दाखवणारा तारा -साहिल मुल्ला



रविवारची सकाळ असायची... दूरदर्शनवर एक गंभीर चेहरा, पण त्याच्या डोळ्यात चमक असायची – डॉ. जयंत नारळीकर. काय बोलायचे ते कळायचं नाही, पण त्यांचं बोलणं ऐकताना वाटायचं, आपल्याला काहीतरी फार मोठं, अद्भुत समजून घ्यायचं आहे. त्या वयात विज्ञान म्हणजे पुस्तकातलं काहीतरी कंटाळवाणं, पण नारळीकर सरांनी विज्ञानाला एका विलक्षण थरारात बदलून टाकलं. अंतराळ, तारे, कृष्णविवर, विश्वाचा विस्तार – या कल्पनाच आपल्यासाठी त्यांच्यामुळे अस्तित्वात आल्या.


१९३८ साली कोल्हापूरमध्ये जन्मलेले जयंत विष्णू नारळीकर हे लहानपणापासूनच गणित आणि विज्ञानाची ओढ बाळगणारे. त्यांच्या वडिलांचाही अभ्यासू वारसा त्यांच्या रक्तात होता. पुढे त्यांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतलं आणि तिथेच त्यांनी महान खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत काम करत "Steady State Theory" निर्माण केली. आज साऱ्या जगात बिग बँग सिद्धांताला पर्याय म्हणून या विचाराला स्थान आहे. म्हणजेच ते फक्त वैज्ञानिक नव्हते, तर एक सिद्धांत निर्माते होते.





विदेशात नाव कमवून भारतात परतल्यावर त्यांनी विज्ञानातील संशोधनाला नवी दिशा दिली. पुण्यात IUCAA – इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स – या संस्थेची स्थापना करून हजारो विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना दिशा दिली. ही संस्था केवळ संशोधन केंद्र नव्हे, तर विचारमंथन आणि विज्ञानप्रेमींसाठी उभारलेलं मंदिर आहे असं म्हणावं लागेल.


त्यांचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे विज्ञानसाहित्य लेखन. त्यांनी मराठीत आणि इंग्रजीत अनेक पुस्तकं लिहिली – जी केवळ विद्वानांसाठी नाही, तर सर्वसामान्य वाचकासाठी होती. विज्ञान या विषयाची जडजंबाल भाषा त्यांनी इतकी सहज सोपी करून दिली, की लहान वाचक सुद्धा ‘क्वासार’, ‘ब्लॅक होल’ किंवा ‘टाईम डिलेशन’ सारख्या संकल्पना वाचून थक्क व्हायचे. त्यांची भाषणं, त्यांचे लेख, आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम म्हणजे जणू एक विज्ञानयात्रा होती – समजून घेण्याची, विचार करण्याची, आणि प्रश्न विचारण्याची प्रेरणा देणारी.


लहानपणापासून ज्यांनी ‘"तारे ’' मोजण्याच्या "पलीकडे जाऊन "विश्व कसं तयार झालं?", "आपण कोण?" हे प्रश्न विचारायला शिकवलं, अशा व्यक्तीचं आयुष्य आपल्याला किती तरी पटीने समृद्ध करून जातं. आम्हाला जेव्हा खगोलशास्त्राविषयी जिज्ञासा वाटू लागली, तेव्हा तिचं मूळ कुठे आहे हे लक्षात आलं – दूरदर्शनवर पाहिलेला एक झगमगता चेहरा आणि पुस्तकांच्या ओळींमधून आलेला तो आवाज – डॉ. जयंत नारळीकर.

२० मे २०२५ रोजी ते आपल्यातून निघून गेले. पण त्यांनी रुजवलेली ज्ञानाची, विचारांची बीजं आज लाखो तरुणांमध्ये उगवलेली आहेत. आज विज्ञानात करिअर करणारे, अंतराळात स्वप्नं पाहणारे, संशोधनात रमणारे हे सारे विद्यार्थी त्यांच्या त्या एका प्रेरणादायी अस्तित्वाचे परिणाम आहेत.


काही व्यक्तिमत्त्वं काळाच्या पलीकडची असतात. त्यांचं शरीर जातं, पण त्यांचे विचार, त्यांची ऊर्जा, आणि त्यांनी दिलेलं दृष्टीकोन जगात तग धरून राहतो. डॉ. नारळीकर हे असंच एक तेजस्वी ताऱ्यासारखं व्यक्तिमत्त्व होतं – त्यांनी विज्ञानाच्या आकाशात अंधार नसावा, म्हणून आपला प्रकाश आयुष्यभर देत राहिला.


आज त्यांच्या आठवणीत डोळे पाणावतात, पण मन मात्र गर्वानं भरून जातं – की आपण अशा काळात जन्मलो, ज्या काळात डॉ. जयंत नारळीकर होते. विज्ञानातही संवेदनशीलता असते, हे त्यांनी शिकवलं. हे आयुष्यभर पुरणारं शिक्षण आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!


प्रा. साहिल रज्जाक मुल्ला

+91 9834627773

Comments


9561398225

  • Facebook
  • Instagram

©2021 by Stay Featured. Proudly Created by Buzzer Media & Advertising

bottom of page